मुंबईत जाणवणारी बोचरी थंडी बडनेरा रेल्वे स्थानकावर उतरल्यावर तडाखा दाखवू लागली होती. अमरावतीवरून पहाटेपहाटे मेळघाटाच्या दिशेने जाताना स्वेटर आणि डोक्यावर माकड टोपी घालूनही अंग कुडकुडत होते. तरीही ड्रायव्हर जोशी सांगत होता, ``साहेब आता तर थंडी कमी झाली आहे`` आमचा विश्र्वास बसत नव्हता. अमरावती... संत गाडगेबाबांचे वलगाव... परतवाडा पार करीत आमची जीप हळूहळू मेळघाटाच्या कुशीत शिरू लागली. सूर्य बर्यापैकी वर आला होता. विशालची चिमुकली तनिष्का आणि माझ्या पाच वर्षाच्या चार्वीची झोप पूर्ण उघडली होती. वर्षा आणि हेमाच्या चेहर्यावरील रात्रभराच्या प्रवासाचा शीण कमी झाला होता. उंचउंच वृश्रराजींमधून वाट काढत कोवळी किरणं जीपची काचं भेदत सर्वांना ऊब देत होती. सिंमेंटच्या जंगलातील माणसांना निर्सग आपला एकएक पैलू दाखवत होता. रस्ता आणि सिपना नदीत नागमोडी वळणाची जणू स्पर्धा लागली होती. सेमाडोहच्या अलिकडे सिपना नदीवरच्या लहानशा धबधब्याने आमचे लक्ष वेधून घेतले. हेमाला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. वर्षानेही सुरात सूर मिसळत गाडी थांबविण्याची सूचना केली. विशाल फारसा उत्साही नव्हता, पण गाडी थांबविण्यास त्याचा नकारही नव्हता. माझी इच्छा नसूनही विरोध करणं अवघड होतं. मला निसर्ग आवडत नाही असं नाही. पण ही केवळ मेळघाटाची झलक होती. संपूर्ण टागर सफारी बाकी होती. वाघोबाच्या दर्शनासाठी आतूर होतो. शिवाय मुंबईहून आलो म्हणून मी काही मुंबईकर नव्हतो. हायस्कूलमध्ये असताना दुसर्याच्या शेतावर दहा रुपये रोजाने कापूस वेचणीस जाताना `दुपारच्या भाकरी` नाल्याकाठीच लहामोठ्या धबधब्यांच्या साक्षीने फस्त व्हायच्या आणि त्याच्याच पाण्याने तहानही भागायची. म्हणून मला या धबधब्याचं अप्रुप नव्हतं. तो तर जणग्याचा भाग होता. मी मुंबईत आलो म्हणून... पण आजही असंख्य ग्रामीण जनतेचं तेच जीवन आहे. माझी पत्नी वर्षाला मात्र त्याचं फार अप्रुप होतं. सहाजिकच आहे. कारण तीच आख्खं बालपण मुंबईलगत गेलं. विशाल आणि त्याची पत्नी हेमा कोल्हापूरकडचे असले तरी शहरातच वाढले- घडलले. ट्रीपची सुरवात विक्षिप्तपणानं नको म्हणून अखेर मीही सगळ्यांएवढाच धबधब्याचा मनसोक्त आनंद घेतला. धबधब्याच्या पुढील प्रवास सुरू झाला. आमचं कोलकाज विश्रामगृहाचं आरक्षण होतं. सेमाडोहवरून पुढे 22 किलोमीटरवर ते आहे. मनमोहक निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास करत आम्ही कोलकाजला आलो. निसर्ग सौंदर्यानं नटलेला आणि जैविक विविधतेनं संपन्न परिसरातील कोलकाज विश्रामगृह म्हणजे वनराईतला स्वर्गचं. उत्तर, दक्षिण आणि पश्चिमेला गच्च झाडी तर पूर्वेला सिपना नदीचं विस्तीर्ण पात्र. माणूस साचलेपणाला कंटाळतो. डोहात साचलेलं पाणी मात्र सिपनाचं सौदर्य खुलवतं होतं. डोहाच्या पुढे दगड गोट्यांवरून खेळत जाणार्या पाण्याच्या प्रवाहचं संगीत कानात गोडवा ओतत होतं. सोबतीला पक्षांचा किलबिलाट होता. सूर्य डोक्यावर आला होता. पण गारठा कायम होता. भराभर आंघोळी आटपून दुपारी तीन वाजता टायगर सफारी सुरू करायची होती. तत्पूर्वी दुपारच्या जेवणासाठी विश्रामगृहालगतच्या कॅन्टिमध्ये जेवणावर भरपेट ताव मारला. खूप दिवसानंतर चुलीवरच्या स्वयंपाकाचा आस्वाद घेत होतो. बाजूलाच कॅन्टिनवाल्यांची म्हैस होती. विशालनं चार्वी अन् तनिष्काला `बफेलो सफारी` घडविली. गावी कधीकाळी शेतातून म्हैसींना हुसकून लावण्याची `ड्युटी` करावी लागत होती. आज त्याच म्हशीचंही अप्रुप होतं. हे सगळंच जुनं तरी नवीन भासत होतं. फरक एवढाच की हे विदर्भातलं होतं. मी खानदेशातील जीवन अनुभवलं होतं.अखेरीस दुपारी तीनच्या सुमारास टायगर सफारी सुरू झाली. एका पुस्तकात वाचलेलं होत, ``मेळघटातील वृक्षलतांवर सुरू असते पक्षिकुळांचं जीवनचक्र. अरण्यभूमीवर पडलेल्या पानापानाखाली पाहायला मिळतं कीटकांचं विश्र्व. आणि तेथील जंगलात सुरू असते व्याघ्रराजाची शाही भटकंती. कशासाठी पोटासाठी, वंशवेल वाढविण्यासाठी. अरण्य जीवंत ठेवण्यासाठी. कारण वाघ हा अरण्याचा प्राण आहे. आत्मा आहे. सुर्याशिवाय सबंध सृष्टीला आधार नाही. हवा- पाण्याशिवाय पृथ्वीचं अस्तित्व नाही. तसचं वाघाशिवाय अरण्य नाही. भारतातील 28 व्याघ्र प्रकल्पात मेळघाट प्रकल्पाचा आठवा क्रमांक लोगतो. महाराष्ट्राचा मेळघाट म्हणून त्याचा सार्थ अभिमान वाटतो. |