नवी दिल्ली, शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2009( 18:27 IST )
ऑस्ट्रेलियाविरुद्ध हातात आलेला विजय गमविल्याचा परिणाम संघाचा आत्मविश्वासावर होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने संघाच्या संतुलनाबद्दल विचार करावा, असा सल्ला लिटील मास्टर सुनील गावसकर याने दिला.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामन्यात तीन व चार धावांनी हरला. हैदराबादमधील सामन्यात सचिनच्या 175 धावांच्या खेळीनंतर तीन धावांना पराभव पत्करावा लागल्यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-2 अशी आघाडी घेतली. यामुळे उर्वरित दोन्ही सामने भारताला जिंकावे लागणार आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गावसकर यांनी सांगितले की, दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलिया संघाकडून हातात आलेले विजय गमविल्याचा परिणाम संघाचा आत्मविश्वासावर होऊ शकतो. यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढविण्याची जबाबदारी कर्णधार धोनी आणि वरिष्ठ खेळाडूंची आहे. त्यांनी संघाच्या संतुलनाबद्दल विचार करावा.